ज:
जाफराबाद(प्रमोद हिवाळे):- अख्या गावात केवळ एकच बौध्द धर्मीय घर असतांना त्या गावातील हनुमान मंदीरात जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असेल आणि त्यासाठी सर्वच धर्मीयांचा सहभाग असले तर त्या ठिकाणी खर्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक न्याय रुजला असे वाटत असल्याची भावना भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर यांनी व्यक्त केलीय.
जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
हनुमंतखेडा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास समता सैनिक दलाच्या सैनिकांनी मानवंदना देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुरुवात करण्यात आली. यावेळी विचारपिठावर भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर, मेजर देविदास बोर्डे, सरपंच ज्ञानेश्वर भोपळे, विनोद खेडेकर, आत्माराम चव्हाण, संजय चव्हाण, श्रध्दा बनकर, प्रा. सिद्धार्थ पैठणे, प्रकाश राऊत, देविदास पैठणे, अविनाश नरवडे, प्रमोद हिवाळे,अरविंद खरात यांची उपस्थिती होती.
हनुमंतखेडा या गावात एकच बौद्ध धर्मीय घर ते दरवर्षी स्वखर्चाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असतात. त्यांच्या जयंती उत्सवात गावातील सर्व धर्मीय लोकांचा हिरीरीने सहभाग असतो. आतापर्यंत केवळ हरिपाठाचा आवाज गुंजलेल्या या मंदिरात काही वेळ त्रिशरण, पंचशीलचा स्वरही गुंजला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सबके लिए खुला है मंदिर ये हमारा…
या गीताची सर्वांना आठवण झाली. असाच एकोपा संपुर्ण जिल्ह्यात आणि देशात दाखविला गेला आणि एकमेकांच्या धार्मीक कार्यक्रमात धावून आले तर देशात समतेचे राज्य प्रस्तापित होण्यास वेळ लागणार नाही असेही महेेंद्र बनकर यांनी म्हटलंय.